नागपंचमी माहिती
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते. श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरुपातुन पिढ्यांपिढ्या पुढे पोहोचवला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुध्दा अशीच एक कथा प्रचलीत आहेत ति आपण पाहु. एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली. दुसर्या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.
उपवासाचे महत्त्व
पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.
* नागाची पूजा करण्यामागील शास्त्र
सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
पुराणांमध्ये एक कथा आहे.
तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले. अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.
0 टिप्पण्या